मुंबई प्रतिनिधी- राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात
काँग्रेस पक्ष आणि खासदार अॅड.चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टी (कांशीराम) यांची आज सकारात्मक चर्चा झाली.
राज्यातील २९ महानगरपालिकेची येत्या १५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणुक होत आहे. सोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुका दृष्टीपथास आहेत.
सदर निवडणूका काहींचा अपवाद वगळता समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढविण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे.काँग्रेसच्या या भूमिकेला अनुसरून खासदार अॅड चंद्रशेखर आजाद यांच्या नेतृत्वाखालील आजाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्या शिष्टमंडळासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची चर्चा झाली.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत युती आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक कमिट्यांना देण्यात आले असून आजाद समाज पार्टी सोबत आघाडी करण्यास काँग्रेस पक्षाकडून मान्यता देण्यात येत असल्याचे सपकाळ यांनी सांगितले .याबाबत स्थानिक कमिट्यांना कळविण्यात येणार असून आजाद समाज पार्टीने देखील आपल्या स्थानिक पदाधिका-यांना चर्चा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे या संयुक्त बैठकीत ठरविण्यात आले.मुंबईत आघाडी करण्याबाबत प्रा.खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत चर्चा करण्यात यावी.अशी सूचना सपकाळ यांनी केली.
यावेळी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे,तर आजाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीषभाऊ साठे,महासचिव जितेंद्र निकाळजे ,मुंबई अध्यक्ष कैलास जैसवार,भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोकभाऊ कांबळे ,महासचिव सुनीलभाऊ थोरात यांनी चर्चेत सहभाग दिला.








