मुंबई प्रतिनिधी
मुंबई मेट्रोमध्ये दिव्यांग प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीचा गाजावाजा झाला, पण प्रत्यक्षात या ‘सवलती’तच मोठा भेदभाव लपल्याचा आरोप पुढे येत आहे. दिव्यांग प्रवाशांना सध्या केवळ मासिक पासावरच सूट दिली जात असून एकल प्रवास करणाऱ्यांना कोणताही लाभ मिळत नाही. त्यामुळे इस्पितळात उपचारासाठी कधीतरी जाणाऱ्या किंवा अधूनमधून मेट्रो वापरणाऱ्या दिव्यांगांना या योजनेचा काहीही उपयोग होत नाही.
याचबरोबर, सवलत मिळवण्यासाठी स्मार्टफोन असणे बंधनकारक करण्यात आले आहे. फोन नसेल तर सवलतीचा प्रश्नच नाही. त्यातही केवळ मोबाइल असला तरी उपयोग नाही—त्यात खास अॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे. म्हणजेच स्मार्टफोन नाही = सवलत नाही असा प्रत्यक्ष नियम लागू होताना दिसतो.
तसेच मेट्रोचे फिजिकल कार्ड अजूनही सुरू झाले नसल्याने तंत्रज्ञान न वापरणाऱ्या किंवा वापरता न येणाऱ्या मोठ्या दिव्यांग प्रवासी वर्गाला व्यवस्थेने थेट दाराबाहेर ठेवले आहे, अशी टीका होत आहे.
या सर्व नियमांमुळे “सवलत” नावाखाली दिव्यांगांना अधिकच अडचणीत ढकलले जात असल्याचा आरोप वरिष्ठ पत्रकार आणि दिव्यांगांच्या न्याय हक्कांसाठी लढा देणारे दीपक कैतके यांनी केला आहे.
कैतके म्हणतात, “दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी सवलत जाहीर झाल्याचे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात या अटी हीच सर्वात मोठी गैरसोय आहे. हे दिव्यांगांबरोबर केलेले सरळसोट अन्याय आणि चेष्टाच आहे.








